Tuesday, 11 March 2025

२. पार्श्वभूमी

" ती ओढ्यावरची कातर वेळ " या कथेला सुरुवात करताना डोळ्यासमोर शहरी जन जीवन, ग्रामीण वातावरण आणि याला जोडणारी नव निर्मितीची वाट दिसत होती. शहरी भागात राहणारी अल्लड मुलगी ग्रामीण वातावरणात कोणकोणत्या बदलांना सामोरी जाते हे रंगवण्यात आणि शब्द रुपात मांडण्यात कथा लिहिताना उत्सुकता वाटली. साक्षीला लिहिताना तिच्या आजूबाजूला निर्माण होत जाणारी वर्तुळे सतत बदलत गेली. कधी ती तुमच्या माझ्यातली एक वाटली. भविष्यात घडणाऱ्या घटना अनाकलनीय असतात. कोणतीही कल्पना नसताना चित्र बदलत जातात. माणसे जोडत जातात. गोष्टी घडत जातात. अशी कथा पुढे सरकत जाते. मात्र कथेच्या शेवटी भूतकाळातील धागे दोरे कळू लागतात. नवं निर्मितीचा ध्यास घेतलेले असे असंख्य लोक सतत प्रयत्न करत असतात, पण ते पूर्णत्वास जाण्यासाठी कदाचित ती वेळ यावी लागते किंवा तशी व्यक्ती. तेव्हाच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. बोलण्यात, राहण्यात, विचार करण्यात कायापालट होतो. आणि अशी कथानकाची जुळणी करणे या कथेत मजेशीर भाग वाटला. कथा लिहिताना त्यात शहरी जीवन आणि ग्रामीण वातावरण यांचे तुलनात्मक वर्णन करताना दोन्ही बाजूचे महत्व टिकवणे गरजेचे होते. नचिकेतची आणि भानुची काळ्या मातीवरची आस्था आणि साक्षी, आराध्याचे महाविद्यालयीन शिक्षण या दोन्हीच्या संगमावर पुढची वाट तयार होत गेली. व्यवसायिक प्रशिक्षण आणि हताश मनाला प्रकाशित करणारा काजव्यासारखा भावनिक ओलावा या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडत कार्य सिद्धीस नेण्याचे केलेले पर्यन्त रंगवताना शिकता ही आले. कथेच्या शेवटी परतीच्या वाटेवर जाण्याची ओढ आणि त्याच वाटेवरून नचिकेतचे वाढलेले वर्तुळ दाखवणे हा हेतू होता. सुरवातीला म्हणल्या प्रमाणे भूतकाळात घडलेल्या घटना आणि त्याला जोडणारा भविष्यकाळातील दुवा. " पुन्हा त्याची भेट "असा एकूण कथेचा आराखडा माझ्या शब्दात मांडला आहे. आनंद, उत्साह, भीती, दुःख, प्रेम अशा भावनिक वर्तुळातून फिरताना आधुनिकतेची स्वप्ने आणि मायेचा ओलावा जिवंत ठेवणारी ती कातर वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी तरी येतेच. या कथेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा यावी ही सदिच्छा.

No comments:

Post a Comment