Tuesday, 25 June 2024

प्रवासातली गोष्ट : १९


 

गाडी गीतांजलीच्या वाड्याच्या दिशेने निघाली. तिथे सुयश सोबत वेगळेच नाट्य रंगले होते. शुश्रूषा क्लिनिकमध्ये सुयशला एक बेनावी फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज व बोलणे ऐकून सुयशच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणभरात बदलले त्याने गडबडीत “ हो... हो... निघालोच ” म्हणत फोन ठेवला.

आपल्या स्टाफला सुचना दिल्या.” आपल्याला ताबडतोब एका ठिकाणी जायचे आहे. लगेच तयार व्हा..” सुयशने ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगितले. तेव्हा स्टाफमधील एकजण बोलला, “ पण आपल्याला कुठे जायचे आहे ते तरी सांगा...” सुयशने सर्वांना सांगितले, “ मुंबईला जाणाऱ्या एका गाडीचे घाटात अपहरण झाले आहे. तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचले पाहिजे. त्यांचा प्रथमोपचार लवकर झाला पाहिजे. दोन रुग्ण वाहिनी पण सोबत घ्या. तिथे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. ” असं म्हणत तो मुंबईच्या दिशेने जायला निघाला. त्याच्याबरोबर चार-पाच डॉक्टरर्स, नर्स आणि बॉय सामान घेऊन निघाले.

“ लवकर पोहोचणे खूप गरजेचे आहे, तेव्हा गाडी थोडी जोरातच चालवा.” सुयशने ड्रायव्हरला सांगितले. सुयशने ड्रायव्हरला ठिकाणाबाबत सविस्तर माहिती दिली त्यानुसार मुंबईला जाणारा रस्ता ड्रायव्हरने लगेचच पकडला. गाडीने आता वेग घेतला होता. सांगितलेल्या ठिकाणी लवकर पोहचणे हेच आता ड्रायव्हरचे देखील लक्ष होते. गाडी मुख्य रस्त्यापासून आत दहा- पंधरा मैल चालली आणि एका वळणाच्या रस्त्याला लागली. ड्रायव्हरने गाडीचा वेग थोडा कमी केला. थोड्या वेळातच अपहरण झालेल्या गाडीजवळ ते पोहचले.

पाहतात तर काय! प्रवाशांची खूपच वाईट अवस्था झालेली होती. कित्येक जण विव्हळत पडले होते. कुणाच्या पायाला तर कुणाच्या हाताला दुखापत झालेली होती. एका म्हातारीच्या डोक्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहत होते. एकंदरीत सर्व चित्र पाहून डॉक्टर सुयशला व त्याच्या सहकाऱ्यांना गलबलून आले. पण ही वेळ पाहत बसण्याची किंवा भावनिक होण्याची नव्हती. सगळया टीमने पटापट जखमींच्या प्रथमोपचाराला सुरुवात केली. गंभीर रुग्णांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्या ठिकाणी पोलीस देखील पोहचले होते, ते सर्वांची कसून चौकशी करत होते. सुयश उपचार करताना पोलीस चौकशी करायला आले.

“तुम्ही कुठे निघाला होतात? गाडी कुठं जात होती?” हाताला व पायाला दुखापत झाल्यामुळे तो इसम विव्हळत बोलत होता.

“मी एका तरुण मुलांच्या ग्रुप सोबत ट्रीपला त्यांचा ड्रायव्हर म्हणून आलो होतो. जाताना एका अपघातात मला थोडे लागले आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. माझ्या घरुन फोन आला. माझी मुलगी खूप आजारी आहे. त्यामुळे मी कामटे फाट्यावरून बस पकडली. ती बस रस्त्यात बंद पडली मग त्या ड्रायव्हर ने दुसऱ्या बस ची सोय केली. ही ती बस. त्या बसने आम्ही घाटात आलो आणि निर्जन ठिकाणी काही जणांनी बस मध्ये शिरून आमच्यावर हल्ला केला. आमचे फोन काढून घेतले. जवळ जवळ पाच सहा तासांनी त्यांनी इथून पळ काढला. जवळपास संपर्कासाठी काहीच नव्हते. शेवटी काही जण इथून पायी चालत वस्तीच्या ठिकाणी निघाले. मदतीच्या शोधात असताना एका देवमाणसाने हॉस्पिटलला कॉल करून सांगितले.

त्यांचे बोलणे सुयशने ऐकले आणि त्यांना विचारले, “म्हणजे तुम्ही सुरज, सनिक यांच्या गाडीचे ड्रायव्हर आहात का?” ड्रायव्हर काकांनी सुयशकडे अचंबित नजरेने पाहिलं.

“काका... तुम्ही आमच्या क्लिनिक मध्ये ऍडमिट होतात. मला सर्व माहित आहे. सुरज, त्याचे मित्र तुम्हाला शोधत होते. तुम्ही इथे आणि मला भेटलात. ” त्या दोघांची भेट ही दैवयोगच असावा असे सुयशला वाटू लागले. इन्स्पेक्टर त्यांचे ऐकून पुढच्या रुग्णाची चौकशी करायला गेले.


Wednesday, 19 June 2024

प्रवासातली गोष्ट : १८


 

सूर्य मावळतीकडे झुकला होता. काळोख दाटत चालला होता. त्या काळोखात मी गीतांजलीचे पूर्वीचे आयुष्य नजरेपुढे आणण्यात मग्न झाले होते. ती डायरी मी सनिक दादाला परत केली. पुढे वाचण्यासाठी मन धजावत नव्हते. पुढे काय झाले असेल याचा अंदाज बांधत मी पुढचा प्रवास केला. कदाचित ही डायरी सुरजने शेवटपर्यंत वाचली असणार म्हणूनच तो त्याचा माग काढत डॉक्टर सुयश पर्यंत पोहोचला असावा.

मला खरंतर त्याला विचारावेसे वाटले की, नक्की काय बदल त्याला यात हवा होता? कोणत्या गोष्टीसाठी तो धडपड करत होता? मी भानावर आले आणि सनिक दादाने अचानक गाडी थांबवली. रात्रीचे वस्तीला थांबायचे होते. म्हणून वाटेत लागलेल्या एका लॉजजवळ गाडी थांबली. सगळे आपापली सामानाची बॅग घेऊन खाली उतरले. रात्रीच्या जेवणाची सुद्धा तिथेच सोय झाली. आम्ही जेवणं आटोपून आपापल्या खोलीमध्ये गेलो. तीन खोल्यांचा बंदोबस्त झाला होता. रात्र असल्याने परिसर नीटसा ओळखता आला नाही. पण आजूबाजूला डोंगर आणि दूरवर पसरलेलं मक्याचं शेत होतं.
 
थंडगार आणि शांत वातावरणात कधी झोप लागली ते समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी नाश्ता करुन आम्ही तिथून निघताना मॅनेजर साहेबांनी स्व-खर्चातून उभा केलेला बागबगीचा आणि छोटेखानी रिसॉर्ट दाखवलं. तिथे फिरताना मला दोन ओळखीचे चेहरे दिसले. जवळ जाऊन पहावे तर आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या नातवाला घेऊन जान्हवीचे सासू सासरेच तिथे फिरत होते. सुरवातीला मला भास झाला असेही वाटले. मग मी ही गोष्ट सुरजला सांगितली. सुरजने खात्रीशीर माहिती घेतली. तेव्हा समजलं की, त्या रिसॉर्टच्या येणाऱ्या उत्पन्नातून आणि सेवाभावी संस्थांकडून मिळणा-या देणगीतून इथे वृद्धाश्रम आणि अनाथालय चालविले जाते. याच अनाथालयात जान्हवीचे बाळ वाढत होते तर तिचे सासू सासरे वृद्धाश्रमात राहत आहेत.

त्यांना पाहिल्यावर सुरज मला म्हणाला, “त्यांच्याबद्दल आपल्याला माहित आहे हे त्यांना अजून कळलेलं नाही. पण त्यांचे इथे असणे म्हणजे काही तरी वेगळेच दर्शवते. ते आणि जान्हवीचा मुलगा जर इथे आहे म्हणजे सुयश जान्हवी हे समीकरण झालेच नाही. काही तरी वेगळंच चित्र इथे दिसते. "

“हो... पण आपण काय करु शकतो...? कशी मदत करु शकतो... हे गीतांजलीला माहिती सुद्धा नसेल. आणि सुयश त्याला तर गीतांजलीच्या निघून जाण्याचे खरे कारण सुद्धा माहिती नसेल. त्याने ती डायरी कुठे वाचली. ती तर आपण वाचली. आपण ती डायरी खरं तर सुयशला द्यायला हवी होती, सुरज... तेव्हाच त्याचा काही तरी उपयोग झाला असता. सुरज तु बरोबर म्हणत होतास. आपल्यामुळे जर कोणाचे भले होणार असेल तर नक्कीच प्रयत्न करायला हवेत. " सुरजकडे आशावादी भावनेने पाहत मी म्हणले.

“आपण खुप काही करु शकतो. आपल्याकडे गीतांजलीची डायरी आहे ना. जी आजी आजोबांनीही कधी वाचली नसेलच. आपण त्यांना ती डायरी दाखवू "
सुरज म्हणला.

“पण त्याने यांना धक्का बसला तर...? आधीच त्यांची परिस्थिती बरोबर वाटत नाही.” मी म्हणले.

“आपण काही ही डायरी त्यांना वाचायला द्यायची नाही... फक्त त्यात काय लिहिले आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू. " सुरज म्हणला.

“म्हणजे ?” मी भुवया उंचावत सुरजला विचारले.
 
सुरज काही न बोलता तिथून निघून गेला. जातांना फक्त " मला सोडून जाऊ नका.” एवढं सांगून गेला.

सनिक दादाने शिटी वाजवून सगळ्यांना जेवायला बोलवले. मी सनिक दादाला झालेला प्रसंग सांगितला. सुरवातीला तो सुरजवर थोडा वैतागलाच. सुरज तासाभराने जान्हवीच्या सासू सासऱ्यांना आणि तिचा मुलगा इशानला माझ्या खोलीत घेऊन आला. त्यांचा चेहरा थोडा गोंधळलेला वाटला. सुरजने बहुदा त्यांना सगळं सांगितलं असावं म्हणून कदाचित त्यांना अपराधीपणाच्या भावनेने ग्रासले होते. या सगळ्या परिस्थिती मधून मार्ग काढण्याचा एकच पर्याय त्यांच्याकडे होता. तो म्हणजे गीतांजलीचा झालेला गैरसमज दूर करुन माफी मागायची. म्हणून त्यांनी गीतांजलीला भेटण्याचा निर्णय घेतला. सुरजने त्यांना सोबत यायला सांगितले. तो पर्यंत सर्वांची जेवणं झाली होती. सुरजने सनिक दादाला रुममध्ये बोलावून सगळी परिस्थिती सांगितली. मी सुरज आणि सनिक दादा तेव्हा त्या खोलीत होतो. जान्हवीचा मुलगा सुद्धा तिथेच होता. त्या साडेतीन-चार वर्षाच्या इशानला काय सुरु आहे याची कल्पनाही नव्हती. खिडकीच्या गजांचा आधार घेऊन तो बाहेरच्या बागेतल्या फुलपाखरांकडे कुतूहलाने पाहत उभा होता. सुरजने सनिक दादाकडे आजी आजोबांना आपल्यासोबत ट्रॅव्हलरमधून गीतांजलीच्या वाड्याकडे नेण्याची विनवणी केली.
 
“आज जर आपण हे करु शकलो तर खूप सारे निरुत्तरीत प्रश्न सुटतील. बघ दादा... काय वाटतं तुला? एक सुख वाटेतच आहे, तिथवर जाण्याचा मार्ग आपण निवडला तर या ट्रिपचा हॅपी एंडिंग होईल. तू हो म्हणालास तर कुणीही विरोध करणार नाही."  मी ही सुरजच्या बोलण्याला दुजोरा दिला. सनिक दादा मनाने संवेदनशील  होताच तो नकार देणं शक्य नव्हतं.
 
सगळेजण सामान घेऊन ट्रॅव्हलरमध्ये बसले. सुरज तेव्हा आजी आजोबांना आणि इशानला घेऊन आला आणि त्यांना पहिल्या सीटवर बसवले. त्या दोघांना तिथे पाहून सगळ्यांना आश्चर्यच वाटले. " सांगतो सांगतो "  म्हणत सुरजने सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नचिन्हाला तात्पुरते शांत केले.




Thursday, 13 June 2024

प्रवासातली गोष्ट : १७


 

त्या दुमडलेल्या पानावर गुलमोहराच्या सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या होत्या. त्या सुकलेल्या पाकळ्यांचा रंग अजूनही गडद होता. गडद रंगाच्या गुलमोहरा प्रमाणेच गीतांजलीने तिच्या आजूबाजूचं वातावरण रंगीत केलं होतं. हे मला त्या दुमडलेल्या पानावर चिकटवलेल्या गृप फोटोवरुन जाणवत होतं. 

मग तिच्या रंगीत विश्वातले रंग कशामुळे उडाले असावेत? याच विचारात डायरीचे  पुढचे पान उलटले.


******


जातांना त्या वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या खिशातून एक फोटो काढला. त्या फोटोमध्ये त्यांचं हसतं खेळतं कुटुंब होतं. थरथरत्या हाताने धरलेल्या फोटोकडे पाणावल्या डोळयांनी पाहत आजी त्यांचा भुतकाळ सांगू लागल्या. जान्हवी तेव्हा गरोदर होती. सहा महिने पूर्ण झाले असताना कळलं की, होणारं मुल बौद्धिकदृष्ट्या विकलांग आहे. तपासणी केल्यावर कळलं की त्यावर काही उपाय नाही. त्यामुळे जान्हवीच्या नवऱ्याने म्हणजेच आमचा मुलगा अनिरुद्ध ... त्याने ते मुल नको असल्याचा निर्णय सुनावला. कोणत्याही परिस्थितीत हे मुल मी स्वीकारणार नाही असे ठणकावून सांगितले. त्याच हट्टापायी तिला माहेरी पाठवून दिले. सहा महिन्याचा गर्भ  स्विाकारण्याशिवाय गंत्यंतरच राहिले नाही. गर्भपातामुळे जान्हवीच्या जीवाला धोका होईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. आम्हाला समजले तेव्हा ते मुल जन्माला यावे म्हणून आम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलो. अनिरुद्धला ही गोष्ट सांगूनही त्याच्या निर्णयात काही फरक पडला नाही. शेवटी आम्ही जाऊन जान्हवीला समजावले आणि या मुलाचा जन्म होईपर्यंत इथेच आई-वडिलांकडे रहा म्हणून तिला सांगितले. 

काही दिवसात जान्हवीने गोंडस बाळाला जन्म दिला. जान्हवी माहेरीच होती. काही दिवसात आम्ही तिला भेटून आलो. त्या निरागस जीवाला पाहून आमचा जीव भांड्यात पडला. बाळ थोडे मोठे झाल्यावर त्याच्या काही चाचण्या झाल्या. आणि देवकृपेने ते बाळ शारीरिक आणि मानसिक दृष्टीने अगदी ठणठणीत असल्याचे समजले. जान्हवीने ही बातमी आम्हाला तात्काळ कळवली. अनिरुद्धने अजून त्याला पाहिले ही नव्हते. जेव्हा त्याला त्याची चूक समजली तेव्हा क्षणाचा ही विलंब न करता त्याने जान्हवीला गाठले. जान्हवीला घेऊन तो पुन्हा आपल्या घरी येणार होता. 


अखेर त्याची जान्हवीची भेट झाली. तब्बल सहा महिन्याने ते एकमेकांना भेटले होते. जान्हवीची त्याने माफी मागितली. तिच्याशी बोलताना त्याच्या मनात खोल वेदना होत होत्या. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. आपल्या मुलाला पाहण्यासाठी आतुर झालेला बाबा त्याला शोधत होता. 


जान्हवीने बाळाला त्याच्या मामाकडे ठेवले होते. जान्हवी मनातून दुखावली होती. तिला अनिरुद्धला माफ करणे आणि बाळाला त्याच्या हवाली करणे, पुन्हा त्याच्यासोबत येणे सारेच कठीण वाटत होते. शेवटी खुप विनवणी केल्यावर ती त्याच्यासोबत बाळाला भेटायला मामाच्या घरी निघाली. दोघे तिकडे जातानाच हा अपघात झाला आणि सगळे गणित बिघडले. तेव्हाचे बिघडलेले गणित अजून ही सुटले नाही, पण ते सोडवणारी एक व्यक्ती आमच्या आयुष्यात आली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुयश... 


आमचा नातू आणि जान्हवी यांच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे दिवस आणणारी एकच व्यक्ती आम्हाला दिसते आहे...डॉक्टर सुयश...” पुन्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. जान्हवीचा भूतकाळ ऐकल्यावर मी थोड्या वेळासाठी नि:शब्द होते.

 

“हो... पोरी, अडचणीत अडकलेल्या आमच्या कुटुंबाला आता डॉक्टर सुयश संजीवनी म्हणून भेटले आहेत. त्यांनी हा सगळा भूतकाळ ऐकला तर ते जान्हवीला नक्कीच आधार देतील. खूप मोठ्या मनाचे आहेत ते... तू बोलशील ना त्यांच्याशी. जान्हवीचे भलं व्हावं आणि आमच्या नातवाला आधार मिळावा हीच आमची शेवटची इच्छा आहे असं समज हवं तर... मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तू आमच्या मुलीसारखीच आहेस. करशील ना एवढं...?” 


मी काहीच बोलू शकले नाही. अर्थात त्यावेळी मी सुन्न झाले होते. अशा वेळी काय बोलावे हे देखील मला काही सुचेना मग त्यांच्याकडे एकदा पाहिलं आणि तिथून बाहेर आले. मी निघाले तेव्हाही ते माझ्याकडे विश्वासाने पाहत असावेत. 


काय करावे सुचत नव्हते, माझी पावले आपसूक जान्हवीच्या वार्डाकडे मला घेऊन गेली. ती काही तरी विणत बसली होती. तिला दरवाजातूनच दोन क्षण न्याहाळत राहिले. काय बोलावे सुचत नव्हते. पण तिच्या निस्तेज चेहऱ्यावर हसू येण्यासाठी मी पुढाकार घेणार हे तेव्हाच ठरवलं होतं. 


नंतर मुद्दाम हॉस्पिटलच्या बागेत जाणं मी टाळू लागले. जान्हवी आपले मन डॉक्टर सुयशकडे हलकं करु शकेल एवढी मोकळीक त्यांच्यात निर्माण करण्यात मी यशस्वी झाले. एकदा आजी आजोबा आले असतांना सुयश आणि जान्हवीला हसतांना पाहून त्यांची मनेही सुखावली. त्यांनी माझ्यासाठी पुरणपोळ्या आणल्या होत्या. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी भरभरून आशीर्वाद आणि कौतुक दिसत होते. सुयश सारखाच चांगला जोडीदार तुलाही मिळावा असा आशीर्वाद देवून ते तिथून निघून गेले. माझ्या डोळ्यात आलेले पाणी मी तिथेच रोखले. 

 

काही दिवसांनी आक्काचं पत्र आलं. तिला दम्याचा त्रास सुरु झाला होता. वाड्यात तिची काळजी घेणारे कुणीही नसल्याने तिने स्वत्:कडे दुर्लक्ष केले आणि तिच्या उपचारासाठी उशीर झाला. यावेळी आजार तिच्या जीवावर बेतणार होता. पण थोडक्यात बचावली. पत्र मिळताच मी तडक वाडा गाठला ते ही कायमचा ....!

 

******


गीतांजलीची डायरी वाचून माझे डोळे पाणावले होते. पोटात गलबलून आले. डायरी पुढे वाचावी की नाही ते समजेना. थोडा वेळ ती डायरी बंद करुन मी त्या विचारातच खिडकीतून बाहेर शून्य नजरेने पाहत बसले.