Wednesday, 12 March 2025

२४. ऋण निर्देश

" फुललेला गुलमोहर - एक गुपित " पूर्ण करताना कथेची रचना आणि मांडणी करताना वेळोवेळी मिळत गेलेले मार्गदर्शन महत्वाचे होते. सुरवातीलाच कथा विश्वाची ओळख करून देण्यात श्री. नितीन चांदोरकर, सौ. दीपा ठाणेकर यांनी पुस्तकाच्या वाचन, निवडीवर मार्गदर्शन केले. त्यानंतर कथालेखन कार्यशाळेमार्फत श्री. किरण येले सर, श्री. प्रणव सखदेव यांचे मार्गदर्शन या कथेसाठी बहुमोलाचे होते. कथेतील बारकावे टिपताना श्री चिंतामणी दातार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले सहकार्य तसेच कथा पूर्णत्वाला नेताना त्याचे व्यवसायिक मार्गदर्शन आणि पुस्तक रुपात येण्याचा प्रवास कवयित्री, लेखिका सौ.ऋतुजा देशपांडे यांनी सुलभ केला. दैदिप्य जोशी या मित्राने ही तंत्रज्ञान आणि संपर्कातून जोडणी करत यात खारीचा वाटा उचलला. लेखन विश्वात मिळत गेलेले लेखनातील हे आणि असे अनेक दुवे हा प्रवास नक्कीच अधिकाधिक उत्तम करत आहेत. यासोबत पारिवारिक पाठिंबा आई, वडील यांनी लेखनात कळत नकळत प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुस्तकाच्या जडण घडणीत हे नक्कीच गरजेचे होते. त्यातूनच पुढे लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. माझ्या वाचक वर्गाने वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले आजवरचे लिखाण वाचून त्याला उत्स्फूर्तपणे दाद देत या प्रवासाला सुरवात झाली होती. त्याचेच फलित म्हणून या वळणावर ही निर्मिती करण्याचे नक्की केले. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही कथा पुढे येत आहे. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... असाच पाठिंबा मिळत राहो ही इच्छा...

Tuesday, 11 March 2025

२. पार्श्वभूमी

" ती ओढ्यावरची कातर वेळ " या कथेला सुरुवात करताना डोळ्यासमोर शहरी जन जीवन, ग्रामीण वातावरण आणि याला जोडणारी नव निर्मितीची वाट दिसत होती. शहरी भागात राहणारी अल्लड मुलगी ग्रामीण वातावरणात कोणकोणत्या बदलांना सामोरी जाते हे रंगवण्यात आणि शब्द रुपात मांडण्यात कथा लिहिताना उत्सुकता वाटली. साक्षीला लिहिताना तिच्या आजूबाजूला निर्माण होत जाणारी वर्तुळे सतत बदलत गेली. कधी ती तुमच्या माझ्यातली एक वाटली. भविष्यात घडणाऱ्या घटना अनाकलनीय असतात. कोणतीही कल्पना नसताना चित्र बदलत जातात. माणसे जोडत जातात. गोष्टी घडत जातात. अशी कथा पुढे सरकत जाते. मात्र कथेच्या शेवटी भूतकाळातील धागे दोरे कळू लागतात. नवं निर्मितीचा ध्यास घेतलेले असे असंख्य लोक सतत प्रयत्न करत असतात, पण ते पूर्णत्वास जाण्यासाठी कदाचित ती वेळ यावी लागते किंवा तशी व्यक्ती. तेव्हाच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. बोलण्यात, राहण्यात, विचार करण्यात कायापालट होतो. आणि अशी कथानकाची जुळणी करणे या कथेत मजेशीर भाग वाटला. कथा लिहिताना त्यात शहरी जीवन आणि ग्रामीण वातावरण यांचे तुलनात्मक वर्णन करताना दोन्ही बाजूचे महत्व टिकवणे गरजेचे होते. नचिकेतची आणि भानुची काळ्या मातीवरची आस्था आणि साक्षी, आराध्याचे महाविद्यालयीन शिक्षण या दोन्हीच्या संगमावर पुढची वाट तयार होत गेली. व्यवसायिक प्रशिक्षण आणि हताश मनाला प्रकाशित करणारा काजव्यासारखा भावनिक ओलावा या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडत कार्य सिद्धीस नेण्याचे केलेले पर्यन्त रंगवताना शिकता ही आले. कथेच्या शेवटी परतीच्या वाटेवर जाण्याची ओढ आणि त्याच वाटेवरून नचिकेतचे वाढलेले वर्तुळ दाखवणे हा हेतू होता. सुरवातीला म्हणल्या प्रमाणे भूतकाळात घडलेल्या घटना आणि त्याला जोडणारा भविष्यकाळातील दुवा. " पुन्हा त्याची भेट "असा एकूण कथेचा आराखडा माझ्या शब्दात मांडला आहे. आनंद, उत्साह, भीती, दुःख, प्रेम अशा भावनिक वर्तुळातून फिरताना आधुनिकतेची स्वप्ने आणि मायेचा ओलावा जिवंत ठेवणारी ती कातर वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी तरी येतेच. या कथेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा यावी ही सदिच्छा.

Friday, 7 March 2025

१. लेखिकेचे मनोगत



' फुललेला गुलमोहर - एक गुपित ' कथेची सुरुवात करताना ती कथा माझी न राहता त्यात माझ्या सखींच्या भावना त्यांच्या शब्दात उतरत जाव्या. ही एक इच्छा समोर ठेवून कथेला सुरवात झाली. सुरवातीपासून ती कथा फक्त एक विचार समोर न आणता वेगवेगळे विचार आणि कल्पना विश्व रंगवत गेली. तिच्या भाव विश्वाचे चित्रण विविध अंगाने साकारता आले. आपल्यातल्या प्रत्येकाला ती कथा माझी होऊन पानावर उतरत गेली.  कथेतील मुख्य नायिका " गीतांजली " गुलमोहराप्रमाणे बहरत गेली. अर्थात हे शक्य झाले ते माझ्या सोबतच्या सह लेखिका सौ प्रणिता आंबरे आणि सौ. सुवर्णा कांबळे यांची साथ घेऊनच. त्यामुळेच कथेचे श्रेय माझ्या इतकेच जोडल्या गेलेल्या या माझ्या सख्यांचे ही तितकेच आहे. 


कथा लिहिताना ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तर ती वाचकांना घेऊन प्रवास करते. कथानकासोबत आपण गाडीच्या प्रवासात, रेस्टहाऊस मध्ये, क्लिनिकच्या जवळपास, आक्काच्या वाड्यात, अंगणात, बागेत पोहोचत जातो. कथेतले सगळे पात्र आणि कथेची नायिका लिहिताना वेगवेगळी रूपके वापरून शब्दात मांडताना कथा आणखी जिंवत होत जाते. 


कथेची सुरवात एका प्रवासाने झाली. हा प्रवास पुढे नव्या वळणावर, नव्या प्रसंगात घेऊन गेला. नव्या नात्यांची ओळख करून दिली. नवा दृष्टीकोन देत कथा पुढे सरकत गेली. काही प्रसंग लिहिताना मनात द्वंद्व निर्माण झाले ही; पण ती कथा आपल्यातील प्रत्येकाची आहे, कथेतील पात्र कुठे ना कुठे भेटत गेले तशी कथा साकारत गेली. 


या कथेचे सह लेखिका सौ. प्रणिता आंबरे यांच्या सोबत कथानक लिहिताना प्रसंगाला तटस्थ पणे पाहून कथा पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी सहकार्य मिळाले. शब्दांची अचूक पणे बांधणी झाली. कथेला विषय आणि आशय दोन्ही जोडून लिहिताना मांडणी व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्याचे मार्गदर्शन प्रणिता ताईच्या लिखाणात वाचताना जाणवले. कथेचा भाग पूर्ण होताच त्याची थोडक्यात झलक भागाच्या शीर्षकात जाणवते. आणि शीर्षक ठरवताना त्या संबंधी वाचन, निकष ठरवताना ताईची मदत झाली. सहनियोजन करत करत कथेला मूर्त स्वरूप मिळाले. 


कथेला ग्रामीण पार्श्वभूमी देताना आक्काच्या वाड्यातील प्रसंग काल्पनिक विश्वातून बाहेर आणतात आणि वास्तवात समोर उभे राहतात. ही ग्रामीण बाजाची लेखणी या कथेला सौ. सुवर्णा कांबळे यांच्या शब्दांतून मिळाली. ग्रामीण जीवन आणि ग्रामीण स्त्री चे भाव विश्व, तिची विचार सरणी मांडताना सौ सुवर्णा कांबळे यांनी जी सहजता वापरली आहे. ती पात्रांना आपल्या आणखी जवळ आणते. विषयाला जोडून आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगाचे चित्रण करणे. वातावरण निर्मिती आणि सर्व सामान्य माणसाचा शोध घेत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही बाजूने मांडणी करण्यात सौ.सुवर्णा यांनी योगदान दिले.


ज्याप्रमाणे ही कथा लिहिताना आमची होऊन लिहिली गेली आणि त्या कथेला तितकीच सुरेख प्रवासाची किनार मिळाली. तशीच किनार कथा पुस्तक रुपात समोर येताना प्रत्येकाला आपली वाटून वाचकांच्या पसंतीस उतरावी हीच इच्छा. 


- जुईली अतितकर