शेवटी त्याने आक्काला गाठले आणि दोघे ही झोपाळ्यावर बसून गप्पा मारू लागले. आक्का पहाटेच उठून सडा रांगोळी देवपूजा करून निवांत बसली होती. सगळे उठल्यावर आक्का सर्वासाठी चहा करायला स्वयंपाक घरात गेली. सुयश एकटाच झोपाळ्यावर झुलत बसला होता. तेवढ्यात तिथे सुरज आला. त्याने सुयशला डायरीबद्दल विचारले. सुयशने होकारार्थी मान हलवली. तोपर्यत गीतांजली उठली होती. ती अंगणात फुलं काढण्यासाठी जाताना सुरजला दिसली होती. सुयशला त्याने अंगणात ती डायरी घेऊन जायला सांगितले. समोरच गीतांजली दिसली. तिचा चेहरा खुललेला होता. बऱ्याच दिवसांपासून त्या अंगणात लावलेल्या गुलमोहराच्या छोट्याशा खोडाला पुन्हा पालवी फुटली होती. हिरवी पोपटी कोवळी पाने बाहेर डोकावत होती. तिच्या अंगणातला गुलमोहर आता पुन्हा नव्याने फुलणार होता.
गीतांजली गुलमोहराच्या नव्या फुटलेल्या पालवीवरून हळूवार हात फिरवत असताना तिच्या मागून सुयश आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “शेवटी फुलला गुलमोहर... तो कदाचित माझी वाट बघत होता... माझ्या येण्याची आणि तुला पुन्हा भेटण्याची...!”
सगळे एव्हाना उठले होते. सुयशने तिच्या समोर डायरी धरली. जेव्हा सुयशने ती डायरी वाचली आणि आपले गुपित त्याला कळले आहे हे गीतांजलीला समजले तेव्हा तिने माफी मागितली. काहीही न बोलता त्याने तिला मिठीत घेतले. तेव्हा तिथे कोणी ही नव्हते. गीतांजली आणि सुयश यांच्या प्रेमाचा साक्षीदार गुलमोहर फक्त तिकडे होता.
सगळ्यांचे आवरून झाले होते. चहा नाश्ता झाल्यावर आमची निघायची तयारी सुरु झाली होती. आक्काने सुरज आणि सगळ्यांनाचीच मीठ मोहरीने दृष्ट काढली. सुरजचे कान पकडून त्याची पाठ थोपटली.
सोमेशला आक्काने घरी बनवलेले लाडू आणि चिवड्याचा डब्बा दिला. माझ्यासाठी त्यांनी एक छान मोगऱ्याचा गजरा आणि चाफ्याची फुलं दिली. सनिक दादाला घरच्या झाडाचे डझनभर आंबे दिले. सगळेच भावूक झाले होते.
सुयश आजी आजोबा आणि इशान यांनी पण निरोप घेतला. आजी आजोबांनी आक्काना गीतांजलीला शुश्रुषा क्लिनिकमध्ये पुन्हा पाठवण्याची विनंती केली. आक्कानी छोट्या इशानला कडेवर घेऊन म्हणले
" गीता आता फक्त माझी पोर नाही... ती तुमची सर्वांची आहे... मला आता तिची काळजी नाही. "
त्यावर सुयश म्हणला " बरोबर म्हणालात आक्का, ती फक्त तुमची मुलगी नाही... मी तिला क्लिनिक मध्ये आताच नेणार नाही तर तिला आता मानाने घेऊन जाईन. आयुष्यभराची जोडीदार म्हणून मला गीतांजली द्याल ना आक्का... "
हे ऐकून आक्काच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. एवढ्या वर्षाची तिची तपश्चर्या फळाला आली होती. याचं भरभरून कौतुक तेव्हा आक्काच्या डोळ्यातून दिसत होतं. आक्का सुयशला म्हणली.
" लवकर या जावयी बापू... आणि माझ्या लेकीला सुखाने नांदवा... मी धन्य झाले... तुमच्या सारखा शिकलेला आणि समजून घेणारा जोडीदार गीताला मिळाला... नशीब काढलंस पोरी "
आक्का गीतांजलीकडे पाहत म्हणाली. गीतांजलीने आक्काला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात विवेक मोठ्याने म्हणला " ताईच्या लग्नाला यायचं हं... "
सगळयांमध्ये हशा पिकला. आम्ही सगळेच आता वाड्यातून परतीच्या वाटेवर निघालो. आक्का आणि वाडा दुरुनच खुणावू लागला. आम्हाला पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन गेला. सगळी गुपितं आणि तो फुललेला गुलमोहर कायमचा मनात घर करून गेला. गीतांजली आणि सुयश आता एकत्र हॉस्पिटल सांभाळतात. त्यांच्या या संसारात आता आणखी दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. इशान आणि जान्हवी त्यांच्या आजी आजोबांसोबत एकत्र राहतात. जान्हवीने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. आता ती क्लिनिक च्या फंड मधून उभे केलेले वृद्धाश्रम सांभाळते. आक्काचा दिवस आता गीतांजलीच्या नवजात जुळ्या बाळांना सांभाळण्यात जातो. आता त्या वाड्यात कोणीच राहत नाही. तरीही आज पुन्हा त्या वाड्यात प्रवेश करताना ती डायरीतली गोष्ट आठवते. त्या डायरीमध्ये अजूनही तो फुललेला गुलमोहर आणि त्याच्या आठवणी अजूनही तशाच ताजा आहेत.
समाप्त
*****
No comments:
Post a Comment