Thursday, 11 April 2024

प्रवासातली गोष्ट : ७

सगळ्यांची जेवणं आटोपली. आक्का सगळ्यांना बडीशेप देऊ लागली.  त्यावेळी गीतांजली मला तिच्यासोबत तिच्या खोलीजवळ घेऊन आली. आम्ही तिथून गेल्याचे सुरजच्या लक्षात आले.  तो आक्काला म्हणाला, “आक्का, मला बडीशेपचा डब्बा द्या, मी सगळ्यांना देतो. लहानपणापासून घरी बडीशेपचा डबा हातात मिरवत मी च सर्वांना वाटायचो. आणा इकडे, मी देतो सर्वांना..."

सोमेशच्या जवळ आल्यावर सुरज चेष्टेने त्याच्याकडे पाहून म्हणाला, “ पोटभर जेवण झालं ना...सोम्या ” इशा संधीचा फायदा घेत म्हणली,

”मला दे... माझं झालंय जेवण कधीचंच...” सुरजने सगळ्यांना बडीशेप दिली. मी आणि गीतांजली तिथे नसल्याचे लक्षात आल्यावर आम्ही कुठे आहोत हे पाहण्यासाठी बडीशेपचा डबा घेऊन तो तिथून निघाला. सुरज बडीशेप घेऊन गीतांजलीच्या खोलीजवळ आला. आता त्याच्याकडे बडीशेप द्यायचं वजनदार कारण होतं. तरीही तो चोरपावलांनी आला आणि तिथेच थांबला. गीतांजली मला तिच्या डायरीमधील, जमवलेल्या वेगवेगळ्या पाना-फुलांच्या नक्षी आणि कलाकुसर दाखवत होती. इतक्यात मागच्या काही पानावर फक्त पिवळ्या लाल केशरी रंगाची गुलमोहराची फुलं ठेवलेली दिसली... बरीच होती. त्यात तिने लिहिलेल्या गुलमोहराच्या झाडाचे सुरेख वर्णन आणि कविता देखील मला वाचायला दिली.

आज वळणाच्या वाटेवर बहरलेला गुलमोहर
लाल, नारंगी रंगाच्या सड्याची आली अंगणी सर
पहाटेच्या किरणांनी रातराणी ही मिटली
कोवळ्या हिरव्या पानात जाई अबोली भेटली
डौलदार पिंपळाची पाने दवात न्हाली
सारा आळस सारुन शुभ सकाळ जाहली
साद देतात पाखरे आज खिडकी आडून
रंग भरला अंगणी सडा रांगोळी घालून
उठा आता तरी सारी सृष्टी ही जागली
आकाशी ही इंद्रधनूची कमान रंगली
 
इतके बारीक निरीक्षण आणि त्यावर इतकी सुंदर कविता... हे गुलमोहराचे झाड तिच्या खूपच जवळचे होते, मी ती कविता वाचून गीतांजलीला त्या झाडाबद्दल विचारले.

पूर्वी मला फुललेला गुलमोहर दिसला की लगेच माझं मन तिथं आकर्षित व्हायचं. मी लहान असताना दादा आणि मी मिळून मागच्या  अंगणात गुलमोहराचे झाड लावले होते. माझ्याबरोबरच ते झाडही मोठे होत होते, विस्तारत होते. त्याच्या फांद्यांनी माझ्या बालपणी मला उंच भरारी घ्यायला शिकवले. नंतर दादा शिक्षणासाठी गाव सोडून शहरात गेला तो कायमचाच. मग मी देखील काम शोधायला या चार भिंतींच्या बाहेर पडले.” गीतांजली सांगू लागली.
 
“मग... त्या गुलमोहराचं काय झालं?” मी मध्येच अडवत विचारलं.

 “मी इथून दहा मैलावर असणाऱ्या शुश्रूषा क्लिनिक आणि नर्सिंग होममध्ये कामाला लागले. ते क्लिनिक आड रस्त्याला असल्यामुळे रोजचं येणं जाणं अवघड झालं होतं. शेवटी आक्काच्या म्हणण्यानुसार मी दोन वर्ष तिथेच राहून नोकरी करायचे ठरवले.”

“आणि मग इथे वाड्यावर आक्का एकटीच...?” मी न राहवून पुन्हा तिला विचारले.

 “आक्काला भेटायला महिन्यातून एकदा येणं जाणं केलं आणि पैसे ही पाठवत होते. तेव्हाच एक दुर्घटना घडली. वादळी पावसामुळे अंगणातल्या गुलमोहराची एक
फांदी कोसळून आक्काच्या अंगावर पडली.  तिला मुका मार लागला.”

“अरेरेऽऽऽ मग...?” मी दुःखं व्यक्त करत तिला विचारले.

 " त्या गुलमोहराच्या झाडावर माझा आधीपासूनच जीव होता त्यामुळे मला काही कळू न देता आक्काने ही गोष्ट फक्त दादाला सांगितली. दादाने पत्रानेच तिला उत्तर कळवले, “इतका त्रास होतोय तर ते झाड काढून टाक, तब्येतीची काळजी घे... झाड काय... पुन्हा लावता येईल..!”

 आक्काने त्यानंतरही मला काही कळू दिले नाही. अखेर ते झाड कापून नेल्यावर शेजारच्या गणेशने सर्व हकीकत मला सांगितली. आक्काला पाहायला मी तशीच तडक वाड्याकडे धाव घेतली. तोपर्यंत आक्का ठीक झाली होती. लागलेल्या जागी थोडी अधून मधून सूज येऊन ठणका बसतो म्हणाली.

"एकदा कळवायचं होतंस ना आक्का...” मी तिला निराशेच्या स्वरातच बोलले.

ते झाड आता तिथे नाही. त्यानंतर तिथे मी एकही झाड लावलं नाही. किंबहूना मला लावावसं कधी वाटलंच नाही..."

गीतांजलीला माझ्या मनातलं कुतूहल म्हणून मी विचारले, “ पण आपलं एखाद्या झाडाशी एवढं घनिष्ठ नातं कसं बरं जोडलं जाऊ शकतं..?” 

मी मनोमन विचार करु लागले. नक्कीच भूतकाळात काहीतरी मागे राहिले असणार? दारावरच्या टकटक आवाजाने आम्ही दोघी भानावर आलो आणि बघते तर काय? सुरज बडीशेप घेऊन दारात उभा होता. मी त्याला काही बोलण्याआधीच गीतांजली त्याच्यावर खेकसली.

 “तू परत आलास इथे?”.

“ही बघ बडीशेप, तीच दयायला आलोय.” दोन पाऊल मागे जाऊन सुरजने तोंड उघडले.

गीतांजलीने माझ्याकडे दिलेल्या डायरीवर नजर फिरवली “तू मला थोड्या वेळाने दे ही डायरी. आता ठेव तुझ्याकडे.” असं म्हणत विषय बदलला. सुरजने आम्हाला बडीशेप दिली आणि आम्ही तिघेही गीतांजलीच्या खोलीतून बाहेर पडलो. पोटभर जेवणानंतर सगळेच आराम करत होते.

हळूहळू अंधार पडू लागला होता. रात्रीच्या प्रवासाची तयारी करुन मी डायरी वाचरणारच होते. गीतांजलीची डायरी वाचण्यासाठी मी माझ्या बॅगजवळ ठेवली. अचानक दिवे गेले आणि चुकून माझ्या बॅगेवर ठेवलेली डायरी कुणाच्या तरी धक्याने इशाच्या बॅगेत कधी गेली कळलंच नाही. सगळी आवरा आवर अजून बाकी होती. सगळेच त्यात गुंतलेले होते.

उघडूनही न पाहिलेली ती गूढ डायरी अजूनही तिच्या बॅगेत आहे हे कोणालाच कळले नव्हते. गीतांजलीलाही नाही. रात्रीचे आठ वाजले, आमची निघायची वेळ झाली. सगळीकडे गुडूप्प अंधार, काळाकुट्ट काळोख. पण आता निघणे गरजेचे होते. नाहीतर आम्ही केलेले सर्व नियोजन कोलमडले असते. आम्हाला अंधारात वाड्याबाहेर जाऊ द्यायचं, आक्काला बरोबर वाटत नव्हतं. तिचं मन तयार होईना. पण सनिक दादाने आक्काची समजूत काढली. आम्ही सामान बांधले. आक्काचा आणि गीतांजलीचा निरोप घेऊन अखेर आम्ही वाडा सोडला.

No comments:

Post a Comment